top of page
समाज
समाजातील वाईट गोष्टींकडे मुले जास्त आकर्षित होतात. पूर्वी हा समाज खूप मर्यादित होता. परंतु आता सहज उपलब्ध असलेल्या सोशल मीडिया वरील चुकीच्या कंटेंट पासून मुलांना दूर ठेवणे अशक्य आहे. त्यामुळे मुलांना करमणुकीचे, कलेचे इतर चांगले प्रकार सहज उपलब्ध करून देणे गरजेचे झाले आहे.
कृतज्ञता- जे काही यश मिळाले ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मदत करणाऱ्या लोकांमुळे. अभिमान – जे काही यश मिळाले त्यामध्ये माझाही सहभाग आहे. अहंकार- जे काही यश मिळाले ते फक्त माझ्यामुळेच, आणि असे यश फक्त मीच मिळवू शकतो..आणि हेच अहंकारी लोकं अपयशाच ओझ मात्र इतर लोकांवर देतात.
खरं तर आपल्या देशाला चोवीस तास वृत्तवाहिन्यांची मुळात गरजच नाही… ठरावी उत्तम मुलाखतींचे कार्यक्रम सोडले तर बाकी टीव्हीवर सगळा दिवस राजकारण्यांच्या मागे फिरून एखाद्या घटनेवर किंवा एखाद्याच्या वक्तव्यावर अभिप्राय विचारण्याचा सपाटा सुरू असतो… त्यामानाने वृत्तपत्रांमध्ये अजूनही सर्व स्तरातील वास्तववादी बातम्या, वैचारिक लेख असतात… पण ते वाचण्यासाठी वेळ असला तरी कष्ट घ्यायची तयारी नसते…
तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत अफाट प्रयत्न करूनही आलेल्या अपयशाबद्दल लोक चर्चा करतील. पण तसे पाहता वादळात पणती किती प्रकाश देतो त्यापेक्षा ती पेटविण्याची इच्छा बाळगणे आणि ती तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न करणे हीच एक धेयप्रप्ती आहे.
असमानता हा न संपणारा विषय आहे. त्याची तीव्रता कालानुरूप कमी जास्त होऊ शकते.
निसर्गातील एक प्राणी म्हणून माणसाने कदाचित प्रगती केलीही असेल. पण जेव्हा लहान मुलांना Good Touch Bad Touch शिकवणे ही काळाची गरज बनते, तेव्हा सामाजिकदृष्ट्या माणूस म्हणून आपला स्तर किती खालावला आहे याची जाणीव होते.
न्यायालयात न्याय मिळणे ही खूप दूरची गोष्ट आहे. आजकाल गुन्हाच नोंद करून घेतला जात नाही हा फार मोठा चिंतेचा विषय आहे. आरोपीला कितीही दुष्ट शक्तींचा पाठिंबा असला तरी सोशल मीडियाच्या शक्तीपुढे प्रशासनाला झुकावे लागते, ही एक सोशल मीडियाची ही एक चांगली बाजू आहे.
आपण इतके भित्रे आहोत की लोकांनी आपल्यावर नाराज होऊ नये म्हणून कोणतीही भूमिका घेत नाही… योग्य अथवा चुकीच्या गोष्टींबाबत आपण मत मांडत नाही… तटस्थ राहून सगळ्यांचा मान सांभाळून स्वतःचे अस्तित्व टिकविण्याची केविलवाणी धडपड करत असतो…
वापरा आणि फेकून द्या, हा विचार खूप विनाशकारी आहे, मग तो वस्तूंच्याबाबतीत असो वा नात्यांच्या बाबतीत. उपभोग वस्तूंचा घ्यावा आणि नाती जपावी. पण बऱ्याचदा आपण उलट वागतो.
वारी – इथे तुम्ही गरीब असो वा श्रीमंत, वयाने लहान असो वा मोठे, या जातीचे असो वा त्या जातीचे, स्त्री असो वा पुरुष, त्याचं काही व्यक्तिविशेष महत्व नाही. इथे तुम्ही फक्त माऊली असता. माऊलींची पालखी हा एकमेव असा सोहळा आहे जिथे भक्ती दिसते. नाहीतर इतर सणांच्या वेळी मिरवणुकीच्या नावाखाली डिजेवर विचित्र गाणे लाऊन अंगविक्षेप करत नाचून एकप्रकारचा तमाशाच बनवला आहे.
आजकाल पोटापाण्यासाठी काम करण ्यात जास्त कष्ट वाटत नाहीत… त्यापेक्षा नोकरीच्या ठिकाणी जाण्या-येण्याचा त्रास जास्त वाटतो…
वाहतूक कोंडीची चिंता नाही…
पण त्यात रुग्णवाहिका अडकलेली असली की जीव कासावीस होतो…
सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी महिलाच जेव्हा बांगड्या घेवून आंदोलन करतात आणि सरकारला बांगड्या भरा असं म्हणतात तेव्हा त्या नकळतपणे महिलांनाच कमी लेखत नाहीत का? नामर्द, षंढ अश्याप्रकरचे अनेक इथे सांगता येणार नाहीत असे शब्द नेते वापरतात तेव्हा त्यांना नक्की कोणाला तुच्छ लेखायचे असते?
शहरात ‘रस्ता ओलांडणे’ ही क्रिया ‘साहसी खेळ’ या प्रकारात येते.
रस्त्यावर, बसमध्ये जातायेता लोक एकमेकांबरबर छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडतात. खरंच त्यांचा तो स्वभाव आहे म्हणून ते भांडतात का? की ते वाहतूक कोंडी, गर्दी, खराब रस्ते या गोष्टींना वैतागलेले असतात. त्यांचा तो राग खरं तर शासनाविरोधात असतो, पण तो कुठे व कसा व्यक्त करायचा हे कळत नाही.
पान मसाला, गुटखा हे पदार्थ खाऊन ‘सार्वजनिक’ अशा ज्या काही वास्तू आहेत तिथे तोंडाने कला साकारली जाते. अशा पदार्थांवर ‘रंग-रंगोटी कर’ आकारला पाहिजे. खर तर आपला राष्ट्रीय रंग तांबडा (रंगाचे ज्ञान कमी असल्याने दुरुस्ती करावी) घोषित करून सर्वत्र तो रंग द्यावा.
फक्त निवडणुकीच्या जागा वाटपासाठी पळापळ करणारे नेते आणि आजही दैनंदिन प्रवासात बसमध्ये बसायला जागा मिळावी म्हणून पळापळ करणारे आम्ही. तुमची मानसिक भिकारी संपली की आम्हाला जागा मिळेल.
इतिहासातील घटना वा व्यक्ती यांच्याकडून आपण कसे वागावे किंवा वागू नये एवढेच शिकायचे असते. कारण ज्या त्या वेळची परिस्थिती वेगवेगळी असते. सध्याच्या काळात त्या घटनांचे दाखले देऊन कोणला कमी लेखणे किंवा स् वतःला भरी समजे म्हणजे मुर्खाचे लक्षण.
एखादा प्रदेश, भाषा, व्यक्तीचे विचार, संस्कृती याबाबात नुसताच अभिमान बाळगून काय साध्य होणार. अभिमान बाळगणाऱ्या त्या गोष्टीमध्ये आपण काही भर घालतो का? काळानुसार त्यात काही बदल करण्यासाठी प्रयत्न करतो का? की त्या अभिमानाचा फक्त इतर गोष्टी कमी लेखण्यासाठी सोयीनुसार वापर करून घेतो?
रस्त्यावर आपल्या वर्तणुकीला कोणी ओळखीचा साक्षीदार नसतो. आपण इतर वाहनचालक वा सहप्रवासी या अनोळखी लोकांबरोबर आपण कसे वागतो ती खरी आपली ओळख, तो आपला खरा स्वभाव. रस्त्यावरील आपली वागणूक म्हणजे एकंदरीत समाजाचा आरसा आहे.
माझ्या लहानपणी काही हिंदी चित्रपटातील दृश्ये घरातील मोठी माणसं घरी नसतानाच बघायचो. आता मोठा झालो पण बातम्या बघायच्या म्हणजे घरात लहान मुलं नसतानाच बघाव्या लागतात. ‘सगळ्याचं पक्षातील’ राजकारण्यांची काय ती भाषा अन् काय त्या शिव्या… सगळं कसं अतिसामान्य…
आम्ही लहानपणी मित्रांना टोपण नावाने जेवढे चिडवत नव्हतो त्यापेक्षा जास्त प्रमाणात सगळेच राजकारणी एकमेकांचे बारसे करून काय आदर्श मांडत आहेत देव जाणे.
एखाद्या समूहाच्या विरुद्ध टोकाची मते मांडत रहा, प्रसिध्दी आपोआप मागे येते. हे तंत्र बरेच लोक सध्या वापरताना दिसतात.
bottom of page